संपादकीय : आषाढी एकादशी २०२०, वारकऱ्यांविना भेटी लागी जीवा | Ashadhi Ekadashi in Marathi

!! जय जय राम कृष्ण हरी !!

सोहळा भक्तीचा, सोहळा परंपरेचा, सोहळा श्रद्धेचा, सोहळा वारीचा, सोहळा आनंदाचा, सोहळा अखंड नामस्मरणाचा, सोहळा वैष्णवांचा, सोहळा पांडुरंगाच्या भेटीचा म्हणजेच सोहळा आषाढी एकादशीचा

श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, तिर्थक्षेत्र पंढरपूर जि, सोलापूर 


वारकरी संप्रदाय मध्ये पंढरपूर, आळंदी आणि देहू यांना खूपच महत्व आहे. वारकरी संप्रदाय मध्ये विविध एकादशी, अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. वारकऱ्यांसाठी पंढरपूर म्हणजे जणू काही संतांचे माहेरघरच आणि आषाढी वारी सोहळा आनंदोस्तव.

वारकरी संप्रदाय म्हणजे संतांच्या आचारविचारांवर चालणारा, त्यांनी दिलेली  शिकवण अंगी कारणारा, भक्तीचा भुकेला आणि अखंड विठूनामाचा जप करणारा समुदाय. वारकरी संप्रदाय मध्ये आषाढी वारीला खूप महत्त्व आहे, महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणारा सांस्कृतिक सोहळा आणि मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर पर्यंत केलेली वारी म्हणजे आषाढी वारी होय.

आषाढी एकादशी आणि वारी सोहळा 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. आषाढी वारी हि महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जी शेकडो वर्षांपासून अखंडित चालू आहे. आषाढी वारी साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लहान खेडेगावातून हजारो दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर पायी वाटचाल करतात. या दिंड्या संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, संत तुकाराम महाराज देहू, संत सोपान महाराज सासवड, संत निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई, गजानन महाराज बुलढाणा , रेडा समाधी आळे येथून निघणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

आषाढी वारीचा इतिहास

पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.

आषाढी वारी पालखी सोहळा

आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा अगदी नयनरम्य असतो. प्रत्येक वारकरी आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याची आणि त्यात मोठ्या भक्ती भावाने सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर कडे वाटचाल करण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. वारकरी विविध दिंड्यांच्या माध्यमातून या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.


पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक ‘वीणेकरी’ असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेक-यानंतर टाळकरींचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे ५ ते १० पर्यंत ध्वज असतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते.या  दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत राहतात. वारकरी दिंडी मध्ये शिस्तीला खूप महत्व असल्याने वारकरी त्याचे तंतोतंत पालन करतात.


पालखी सोहळ्यात चालताना वारकरी अखंड ज्ञानोबा माउली तुकाराम, विठू नामाचे नामस्मरण करत वाटचाल करीत असतात. अभंग, विविध भारुडे, किर्तने म्हणत वारकरी मार्गस्थ होत असतात. वारी मध्ये लहान मोठा असा भेदभाव न करता सगळ्याना माउली नावाने संबोधतात.



पालखी सोहळ्या दरम्यान प्रत्येक जण आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा हा भक्तिभाव त्यामागे असतो. जागोजागी डॉक्टरांकडून आणि विविध आरोग्य सेवा संस्थांकडून वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पालखी सोहळ्याच्या मार्गात येणाऱ्या विविध गावांमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या नाश्ता, चहापाणी आणि जेवणाची सोय केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री हरिपाठ, अभंग. किर्तन होत असतात. यामुळे वारकऱ्यांचा दिवसभरचा थकवा कमी होतो.

या ठिकाणांहून मुख्य पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात.
  • संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी पुणे
  • संत तुकाराम महाराज मंदिर, देहू पुणे
  • संत सोपान महाराज मंदिर, सासवड पुणे
  • संत निवृत्ती महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक
  • संत मुक्ताबाई मंदिर, मुक्ताईनगर जळगाव
  • संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर, आळेफाटा पुणे
  • श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव बुलढाणा
पालखी मार्ग 


या सर्व दिंड्या आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर वाखरी येथे एकत्र येतात.

पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये

गोल रिंगण 

पालखी सोहळ्यादरम्यान प्रत्येक वारकरी रिंगण सोहळ्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. काटेगाव, कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगणाच्या वेळी मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. रिंगण सोहळ्या दरम्यान टाळ मृदूंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. रिंगण सोहळ्यात माउलींच्या अश्वाच्या २ फेऱ्या पूर्ण झाल्या कि अश्वाच्या पायाखालील माती कपाळावर लावण्यासाठी वारकरी गर्दी करतात. यातून माऊलींचा आशिर्वाद मिळत असल्याची वारकऱ्यांची भावना असते.

पालखी सोहळ्यात पार पडणारे नयनरम्य गोल रिंगण 




धावा 

धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात

शासकीय महापूजा

आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्रचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे आणि भाग्याचे समजले जाते.

आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या अन्य काही महत्त्वाच्या दिंड्या

शाळकरी दिंडी : 

वारकरी संप्रदाय आणि वारीच्या परंपरेची माहिती शाळेतील मुलांना  आणि पुढील पिढ्यांना होण्यासाठी प्राथमिक आणि  माध्यमिक शाळा मध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात. विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करून पालखी सजवून पालखी सोहळा साजरा करतात. हे छोटे वारकरी ठरावीक अंतर पायी चालून वारीचा अनुभव घेतात.

अभियंता दिंडी :

पुणे हे IT पार्क आणि औद्योगिक क्षेत्राचे महत्वाचे शहर असल्यामुळे येथे लाखोंच्या संख्येने अभियंते काम करीत असतात. कामामुळे या अभियंत्यांना पूर्ण वारी करणे शक्य होत नाही. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस पुणे येथे मुक्कामी असतात. या दरम्यान हे अभियंते रजा घेऊन मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात.

सायकल दिंडी :

सायकल दिंडीच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे वारकरी विविध सामाजिक, कौटुंबिक, पर्यावरण संवर्धन विषयावर गावोगावी जनजागृती, त्याचे महत्व लोकांना पटवून देत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात.

फेसबुक दिंडी :

सोशल मिडियाच्या जमान्यात युवक मित्र मैत्रिणीसाठी आपल्यातीलच काही युवक पुढाकार घेऊन या फेसबुक दिंडीचे विविध फेसबुक पेज च्या माध्यमातून आयोजन करत असतात. याद्वारे आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे सगळे अपडेट्स आपल्या फेसबुक पेज च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात.

यंदाचा आषाढी वारी पालखी सोहळा २०२०

संपूर्ण जगात कोरोनाचा महाउद्रेक झालेला असताना त्याचा फटका आपल्या यंदाच्या ऐतिहासिक आषाढी वारीलाही बसला आहे. तब्बल ८०० हुन अधिक वर्षांपासून अखंड चालू असलेला आषाढी वारीचा नयनरम्य सोहळा या वर्षी कोरोनामुळे सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारकडून इच्छा नसतानाही रद्द करावा लागला. त्यामुळे वारकऱ्यांच्या हिरमोड झाला खरा परंतू त्यांच्या आनंदोत्सवात काही कमी झालेली नाहीये.

 आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरावर केलेली नयनरम्य रोषणाई 



यंदा माउली ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु संत तुकाराम महाराज आदी संतांच्या पालख्या आपल्या सर्वांच्या आवडत्या लाल परी एसटी ने मोठ्या भक्ती भावाने पालखी मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. पादुकांबरोबरच विणेकरी, टाळकरी असे २० वारकर्यांना या पालखी बरोबर जाण्याचा मान मिळाला. पालखी मार्गावर वारकऱ्यांकडून लालपरीचे स्वागत करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी लालपरी एसटी ने पंढरपूरकडे मार्गस्थ होताना 


लालपरी एसटी मध्ये ज्ञानोबा माउली तुकाराम, विठू नामाचा अखंड गजर 


जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लालपरी एसटी ने पंढरपूरकडे मार्गस्थ होताना 


आषाढी वारी आणि त्यानिमित्त निघणारा पालखी सोहळा हा फक्त एक सोहळा नसून आपल्या संतांनी दिलेल्या विचारांचे नामस्मरण करून साजरा करण्यात येणारा आनंदोत्सव आहे. या वारीतून खूप काही शिकण्यासारखे आहे.  माणूस या जगात येताना काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही, त्यामुळे माणसाने आयुष्य जगताना कशाचीही चिंता करू नये. कटेवर हात आहे आणि विटेवर जो उभा आहे तोच पांडुरंग या जगाचा कर्ता करविता आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धात जे आहे त्याला ते मिळणारच. त्यामुळे माणसाने कोणाचीही निंदा न करता सगळ्यांचं कसं भलं हॊईल या भक्तिभावातून आपले आचरण करून आयुष्य जगावे अशी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे.

खरंच....प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आषाढी वारी करावी. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.


आम्ही जुन्नरकरच्या सर्व रसिक वाचकांना आषाढी एकादशी निमित्त खूप शुभेच्छा. माझा हा लेख आपल्याला कसा वाटला हे मला खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या प्रियजनांबरोबर शेयर करायला विसरू नका.


धन्यवाद.

लेखक : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad