संत ज्ञानेश्वर महाराज
आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. विविध अभंग, भारुडे, गौळणी, किर्तन यांच्या माध्यमातून संतांनी वारकरी संप्रदायाचा पाय रचला. यातील एक संत म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज.
मूळ नाव : ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
जन्म : इ.स. १२७५, आपेगाव, महाराष्ट्र
निर्वाण : इ.स. १२९६, आळंदी; महाराष्ट्र
समाधिमंदिर : आळंदी देवाची
संप्रदाय : नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय
वडील : विठ्ठलपंत कुलकर्णी
आई : रुक्मिणी कुलकर्णी
विशेष माहिती :
संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव या गावी झाला.आपेगाव हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. त्यांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी झाला. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला निघून गेले.त्यांच्या गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले.
त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. त्यांचे थोरले बंधु निवृत्तीनाथ तर धाकट्या भावाचे नाव सोपानदेव आणि बहिणीचे नाव मुक्ताई असे होते. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी या ठिकाणी येऊन स्थायिक झाले. त्या काळामध्ये संन्यासाची मुले म्हणून या भावंडांना हिनवले जाई. गावाने त्यांच्या कुटूंबाला वाळीत टाकले होते. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात चांगले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून प्रायश्चित्त घेतले.
पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता आणि महानता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली.
भावार्थदीपिका हे भागवतगीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. संत ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली.(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार)
अधिक वाचा : श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट